प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव– धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय कार्यालयीन कामकाजात येणाऱ्या अडचणी आणि तक्रारींचे तातडीने निवारण व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या संकल्पनेतून 'जनता दरबार' या उपक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येत आहे.
हा उपक्रम आठवड्यातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या कार्यालयीन दिवशी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत राबविण्यात येणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील कोणताही नागरिक धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून मा. जिल्हाधिकारी यांच्यासमोर थेट संवाद साधू शकतो, तसेच स्वतःच्या अडचणी, समस्या किंवा तक्रारी अर्जाद्वारे मांडू शकतो.
या उपक्रमामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट जिल्हा प्रशासनाकडे मांडण्याची संधी मिळणार असून, विविध शासकीय विभागांच्या कामकाजात पारदर्शकता व गती येण्यास हातभार लागणार आहे.
उपक्रमाचे वैशिष्ट्ये:
नागरिकांना थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवादाची संधी
वेळेवर व परिणामकारक तक्रार निवारणाची शक्यता
जिल्हा प्रशासन व नागरिक यांच्यात समन्वय व विश्वास दृढ होणार
शासकीय कामकाजात पारदर्शकतेला चालना
धाराशिव जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या शासकीय अडचणी आणि तक्रारी घेऊन "जनता दरबार" मध्ये आवर्जून सहभागी व्हावे आणि प्रशासनाशी थेट संवाद साधून प्रश्न मार्गी लावावेत.
0 टिप्पण्या