Ticker

6/recent/ticker-posts

सर्व पदाधिकाऱ्यांचा राजीनामा देण्याचा निर्णय;निष्क्रीय जिल्हाप्रमुख पनुरे यांच्याविरोधात बंड

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील शिवसेना व युवासेनेत सध्या मोठा राजकीय भूकंप घडताना दिसत आहे. पक्षाचे तालुक्यातील जवळपास सर्वच प्रमुख पदाधिकारी आपापल्या पदांचा सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. यामागचे प्रमुख कारण म्हणजे सध्याचे जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांचे पक्षवाढीसंदर्भातील निष्क्रीय व पक्षविरोधी कारभार असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.


पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे तसेच परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी लवकरच भेट घेऊन राजीनामे सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.


पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे की, जिल्हाप्रमुख पनुरे यांनी तुळजापूर तालुक्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. स्थानिक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी हातमिळवणी करून केवळ स्वहितासाठी राजकारण केले. पक्षवाढीसाठी कोणतीही बैठक, आंदोलन, शाखा उघडण्याचे प्रयत्न झाले नाहीत. शिवाय, पक्षसदस्य नोंदणीचे अर्जही पदाधिकाऱ्यांना दिले गेले नाहीत.


अलीकडेच अमोल जाधव यांची तालुकाप्रमुखपदी झालेली नियुक्ती हे या बंडाचे मुख्य कारण ठरले. जाधव यांची निवड उबाठा गटातून शिवसेना शिंदे गटात आलेल्या कार्यकर्त्याची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून,ती निवड कोणत्याही तालुक्यातील पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता करण्यात आली. त्यामुळे असंतोषाचा कडवा सूर उमटत आहे.


पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार, तालुक्यातीलच कुणी व्यक्ती नवा जिल्हाप्रमुख म्हणून नेमावा आणि जाधव यांची नियुक्ती तत्काळ स्थगित करावी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे.


शिवसेना पक्षामध्ये मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या शिंदे गटाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पहिले तालुकाप्रमुख म्हणून तुळजापूर येथील संभाजी पलंगे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या काळात शिवसेना संकटात सापडलेली असताना, पलंगे यांनी मोठ्या जिद्दीने आणि निष्ठेने पक्षबांधणी केली. कार्यकर्त्यांना एकत्र ठेवून तुळजापूर तालुक्यात पुन्हा एकदा शिवसेनेचा आवाज बुलंद केला.


त्यावेळी शिवसेनेच्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांनीही पलंगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षासाठी उभे राहत चळवळीला गती दिली. गावे-गावे जाऊन पक्षाच्या विचारधारेचा प्रचार करण्यात आला. हे करत असताना त्यांनी स्थानिक पातळीवर एक मजबूत कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली, ज्यामुळे शिंदे गटाचे बळ तालुक्यात वाढले.


मात्र, नुकत्याच पार पडलेल्या नूतन तालुका प्रमुख निवडीमध्ये संभाजी पलंगे यांना पूर्णपणे डावलण्यात आल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. या बदलाची पूर्वसूचना न देता नवीन नेतृत्वाची घोषणा केल्यामुळे पलंगे यांच्या फळीमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, संभाजी पलंगे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी आतापर्यंत मोठे योगदान दिले असून, त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही नाराजी तीव्र झाली आहे. आगामी काळात या सर्व कार्यकर्त्यांकडून सामूहिक राजीनामा दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही घटना जर प्रत्यक्षात आली, तर ती तालुका पातळीवर शिंदे गटासाठी मोठा धक्का ठरू शकते.


पक्षांतर्गत संवादाचा अभाव, एकतर्फी निर्णयप्रक्रिया आणि जुना संघर्ष विसरून नवीन चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाणे, या मुद्द्यांमुळे ताणतणाव वाढला आहे. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संभाजी पलंगे व त्यांच्या सहकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची गरज आहे.


तुळजापूरसारख्या संवेदनशील आणि राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या तालुक्यात, स्थानिक कार्यकर्त्यांचा रोष किंवा उदासीनता शिंदे गटासाठी भविष्यात अडचणीची ठरू शकते. त्यामुळे, यावर तातडीने तोडगा काढणे आणि ज्यांनी संकटकाळात साथ दिली, त्यांच्या कामाची योग्य दखल घेणे ही पक्षासाठी अत्यंत गरजेची बाब ठरणार आहे.


राजीनामा देणाऱ्यांमध्ये जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम, उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, तालुकाप्रमुख संभाजी पलंगे, उपतालुकाप्रमुख विपीन खोपडे, लक्ष्मण माळी, रमेश काटगावकर, बंजारा सेलचे तालुकाप्रमुख देविदास राठोड, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख सुरज कोठावळे, नळदुर्गचे शहरप्रमुख शिवाजी सुरवसे, जिल्हा सचिव घोडके, विधानसभा अध्यक्ष खंडु कुंभार, तालुका संघटक गणेश रोकडे, निरंजन कारंडे, सोशल मिडिया प्रमुख संतोष दुधभाते आणि अनेक शाखाप्रमुख व विभागप्रमुखांचा समावेश आहे.


तुळजापूर तालुक्यातील शिवसेनेतील या बंडखोरीचा आगामी नागरिक, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. जर पक्षाकडून जिल्हाप्रमुखाची उचलबांगडी व नियुक्ती स्थगितीचा निर्णय लवकर झाला नाही, तर कार्यकर्त्यांचा पक्षावरील विश्वास ढासळण्याची भीती आहे.


तुळजापूर तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे आवाज उठवून पक्षश्रेष्ठींना एकप्रकारे आल्टीमेटमच दिला आहे. स्थानिक नेतृत्वाला न्याय न मिळाल्यास कार्यकर्ते दुसरे पर्याय निवडण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशाराही देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या