Ticker

6/recent/ticker-posts

विविध क्षेत्रांतील सहभागातून ‘ग्रीन धाराशिव’ मोहिमेला गती; १९ जुलै रोजी १५ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव : या पावसाळ्यात ‘ग्रीन धाराशिव’ या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात एकूण ५० लाख वृक्ष लागवड व संगोपन मोहिम राबवली जाणार आहे. विशेषतः १९ जुलै रोजी एका दिवसात तब्बल १५ लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, ही मोहीम गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सांगितले.


जिल्हाधिकारी कार्यालयात आज वृक्ष लागवड व संगोपन मोहिमेच्या तयारीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी पुजार यांनी विविध क्षेत्रांतील व्यक्ती, स्थानिक संस्था आणि नागरिकांना विश्वासात घेऊन मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन केले.


या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, कृषी अधीक्षक रवींद्र माने, विभागीय वन अधिकारी बी.एस. पोळ, सामाजिक वनीकरण उपसंचालक श्री. करे, शिक्षणाधिकारी अशोक पाटील, उपविभागीय अधिकारी अरुणा गायकवाड, नगर परिषद प्रतिनिधी अजित डोके, सांख्यिकी उपसंचालक सुधाकर जाधव आदी उपस्थित होते.


“वृक्ष लागवडीसाठी निवडलेल्या ठिकाणांची पाहणी नोडल व सहाय्यक नोडल अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह करावी. लागवड, रोपे, पाणी, खत, साहित्य व वाहतूक व्यवस्था यांचे सूक्ष्म नियोजन करून यादी तयार करावी,” असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.


“१९ जुलै रोजी सकाळी ६ वाजता उपस्थिती नोंदवून ७ पासून लागवड सुरू करावी. गावपातळीवर सरपंच, उपसरपंच, सेवाभावी संस्था, शिक्षक व विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करावा. वृक्ष लागवडीनंतर त्याचे संगोपन हे तितकेच महत्त्वाचे आहे,” असेही ते म्हणाले.


डॉ. मैनाक घोष म्हणाले, “ही मोहीम धाराशिव जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असून, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात सामाजिक जनजागृती घडवून आणावी.”


उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांनी सांगितले की, “लागवडीपूर्वी पाण्याचे स्रोत, मशागत, कंपोस्ट खत या सर्व गोष्टींची पूर्तता व्हावी. प्रत्येक गावासाठी ३०० स्वयंसेवकांची यादी तयार करावी.”


या बैठकीत सर्व तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, कृषी व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सर्व यंत्रणांनी समन्वय साधून काम करावे, असे स्पष्ट निर्देश बैठकीत देण्यात आले.


मुख्य मुद्दे :


१९ जुलै रोजी एका दिवसात १५ लाख वृक्षांची लागवड


मोहिम गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी नामांकित करण्याचा प्रयत्न


गाव पातळीवर सरपंच, शिक्षक, सेवाभावी संस्था यांचा सहभाग


रोप, पाणी, खत, वाहतूक यांचे सूक्ष्म नियोजन


संगोपनावर विशेष भर


‘ग्राम ते शहर’ ही भावना बाळगून, नागरिकांच्या सामूहिक सहभागातून ‘ग्रीन धाराशिव’ साकार करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या