Ticker

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्यात महामार्गावरील चोऱ्यांना लगाम घाला – पालकमंत्री सरनाईक यांचे स्पष्ट आदेश

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव :धाराशिव जिल्ह्यातील बीड–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अलीकडच्या काही दिवसांत चोऱ्या आणि लूटमारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे समोर आले आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याची गंभीर दखल जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना तातडीने कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.


येडशीपासून पारगाव दरम्यान – तेरखेडा, येरमाळा आदी परिसरांमध्ये रात्रीच्या वेळी अथवा वाहने थांबवून प्रवाशांना लुटले जात असल्याच्या घटना वाढत आहेत. काही ठिकाणी मालवाहू ट्रक किंवा प्रवासी वाहनांमधून चोरटे माल लंपास करतात, तर काही वेळेस प्रवाशांनाही थेट धमकावून रोख रक्कम, मोबाईल्स, दागिने काढून घेतले जातात. या गंभीर प्रकाराची माहिती शिवसेना सह संपर्कप्रमुख भगवान देवकते, युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख नितीन लांडगे आणि पांडुरंग घुले यांनी थेट पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यापर्यंत पोहोचवली.


या प्रकरणाची तत्काळ दखल घेत पालकमंत्री सरनाईक यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना थेट फोन करून कडक कारवाईचे आदेश दिले. “चोरी आणि लूटमार करणाऱ्यांना त्वरित शोधा, त्यांच्यावर कठोर कारवाई करा. महामार्गावरील नागरिक आणि प्रवाशांचे संरक्षण हे पोलीस प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.


त्याचबरोबर, या घटनांना आळा बसावा यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश सरनाईक यांनी दिले आहेत. “जर यासाठी निधीची आवश्यकता भासली, तर जिल्हा नियोजन निधीतून ते दिले जातील. त्यासाठी प्रस्ताव तात्काळ सादर करा,” असा स्पष्ट निर्देशही त्यांनी दिला आहे.


या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाची आगामी कारवाई आणि महामार्गावरील सुरक्षा व्यवस्था कशी उभारली जाते याकडे आता जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. प्रवाशांचे आणि वाहतुकीचे सुरक्षेचे प्रश्न आता गंभीर पातळीवर गेले असून, प्रशासनाची तत्परता आणि कडक कृती ही काळाची गरज बनली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या