प्रतिनिधी : जुबेर शेख
भाग - 05
तुळजापूर – तुळजापूर-लातूर राष्ट्रीय महामार्गावर काक्रंबा येथे उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या मुरूम उत्खनन परवाना संपल्यानंतरही खुलेआम सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
वृत्तमालिकेच्या माध्यमातून यापूर्वीही या प्रकरणाची माहिती उघड झाल्यानंतर जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, या कामासाठी परवाना संपुष्टात आला असतानाही उत्खनन थांबवले गेलेले नाही. उलट, ज्या क्षेत्रासाठी परवानगी होती त्याव्यतिरिक्त इतर गटांमधूनही अवैध उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
या संदर्भात बनावट परवाने वापरण्याचा संशयही व्यक्त करण्यात येत असून, मागील तारखांना कालबाह्य परवान्यांचा आधार घेत उत्खनन सुरू ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. हे सर्व प्रकार तहसील कार्यालय, खणीकर्म अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या नजरेसमोर घडत असतानाही यंत्रणांनी डोळेझाक केल्याने या विभागांच्या भूमिकेवर संशय घेण्यात येत आहे.
यामुळे केवळ पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही, तर शासनाच्या महसुलावरही प्रतिकूल परिणाम होत आहे. शासनाला मिळणाऱ्या स्वामित्वधनाच्या माध्यमातून लाखो रुपयांचे नुकसान होत असून, ही रक्कम कंत्राटदारांच्या खिशात जात असल्याचा आरोप होत आहे. शासनाच्या तिजोरीला फटका बसण्यास कारणीभूत असलेल्यांवर मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
मुदत संपलेले परवानेतलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्यापर्यंतच्या साखळीत कोणाचातरी मूक सहकार्य असल्याशिवाय असा प्रकार इतक्या वेळ सुरू राहू शकतो का?,असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी आणि काही राजकीय संघटनांनी या प्रकरणाची सखोल चौकशी निःपक्षपाती आणि स्वतंत्र यंत्रणेमार्फत करण्याची मागणी केली आहे. महसूल विभागाच्या बाहेरच्या तपास यंत्रणेकडून चौकशी होईल, तरच सत्य बाहेर येईल आणि दोषींवर कठोर कारवाई होईल, अन्यथा शासनाची संपत्ती खासगी स्वार्थासाठी लुटली जात राहील,असे बोलले जात आहे.
0 टिप्पण्या