प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव:धाराशिव आणि बार्शी तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून एका वाघाने धुमाकूळ घातला असून, वन विभागाला तो अद्यापही पकडता आलेला नाही. वाघाच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी अनेक आंदोलने झाली, निषेध व्यक्त करण्यात आला, अगदी जिल्हाधिकाऱ्यांना गाढव भेट देण्याची वेळ सुध्दा आली होती, तरीही वाघाला पकडण्याचे प्रयत्न अपयशी ठरत आहेत.
वन विभागाला मुदतवाढ – 20 एप्रिल अंतिम तारीख
वन विभागाच्या निष्क्रियतेबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून वन विभागाला अजून एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत 20 एप्रिल रोजी संपणार आहे. मात्र, या कालावधीतही वाघ सापडला नाही तर गाढव भेट आंदोलन होण्याची शक्यता आहे.
पुण्याच्या विशेष टीमचे आगमन – अजूनही वाघाचा थांगपत्ता नाही
वाघ पकडण्यासाठी पुण्याहून एक विशेष टीम धाराशिवमध्ये दाखल झाली असून, आता आणखी एक डॉक्टर आणि अजून टीम मेंबर बोलवण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्यातील वन विभाग अधिकारी आणि कर्मचारी या मोहिमेत गुंतले आहेत. धाराशिव, उमरगा, तुळजापूर आणि इतर तालुक्यांत वाघाच्या हालचाली शोधण्याचे काम सुरू आहे. मात्र, 26 फेब्रुवारी रोजी वाघाला डॉट मारण्यात आले तरी तो बेशुद्ध झाला नाही. त्यानंतर तब्बल एक महिना उलटला, पण वाघाचे दर्शन कुठेच झालेले नाही.
वन विभागाचे अपयश की पैशांची उधळपट्टी?
26 फेब्रुवारीनंतर वाघाचा कुठलाही ठोस पुरावा वन विभागाला मिळालेला नाही. नागरिकांचा रोष वाढत आहे की, वन विभागाच्या टीम वाघ शोधत आहेत की केवळ दिखावा करत आहेत? मागील महिन्याभरात अधिकारी केवळ अंदाज लावत बसले आहेत की, वाघाने आपली जागा बदलली असेल. पण प्रत्यक्षात त्याला शोधण्यात कुठलाही यश आलेले नाही.
वाघ हुशार की वन विभाग निष्क्रिय?
"ज्या ठिकाणी वाघ पूर्वी दिसत होता, तिथे तो आता येत नाही. त्यामुळे त्याने नवीन ठिकाण शोधले असावे." पण हा शोध मागील एक महिन्यापासून सुरू आहे, तरीही वाघ सापडत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे की, "वन विभागाला वाघाचे दर्शन होईल का,की गाढवाचेच?" हा येणारा काळच सांगेल.
नागरिकांच्या अपेक्षा – ठोस कारवाईची मागणी
गेल्या तीन महिन्यांपासून भीतीच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांनी आता ठोस कारवाईची मागणी केली आहे. जर 20 एप्रिलपर्यंत वाघ सापडला नाही, तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल व वनमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत गाढव भेट देण्यात येईल,असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिला आहे.
आता येणारा काळच ठरवेल – वन विभाग वाघाला पकडण्यात यशस्वी ठरेल की केवळ वेळकाढूपणा करेल? आता धाराशिवकरांचे लक्ष या घटनेच्या पुढील घडामोडींवर आहे.
0 टिप्पण्या