प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर – महाबोधी बुद्धगया मंदिर येथील बौद्ध समाजाच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, तसेच मंदिरावर झालेल्या कथित अतिक्रमणाविरोधात आणि हिंदू पूजापद्धती बंद करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) रोजगार आघाडीच्या वतीने एक दिवसीय लक्षणीय उपोषण आयोजित करण्यात आले आहे.
हे उपोषण रोजगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय नाना शितोळे यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर तहसील कार्यालयासमोर आयोजित करण्यात आले असून, दिनांक २५ मार्च २०२५ रोजी सकाळपासून सुरू होणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने भीमसैनिकांनी सहभागी होऊन बौद्ध समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवावा, असे आवाहन संजय नाना शितोळे यांनी केले आहे.
उपोषणाचे प्रमुख मागणी मुद्दे:
1. महाबोधी बुद्धगया मंदिरावरून ब्राह्मण समाजाने केलेले अतिक्रमण दूर करावे.
2. हिंदू पूजापद्धती बंद करून मूळ बौद्ध पूजापद्धती पुन्हा सुरू करावी.
3. १९४९ चा कायदा रद्द करून महाबोधी बुद्धगया मंदिर बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा.
बौद्ध समाजाच्या हक्कांसाठी निर्णायक लढा
महाबोधी मंदिर हे बौद्ध धर्मीयांसाठी पवित्र स्थळ असून, बुद्धांशी संबंधित ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या या ठिकाणी बौद्ध समाजाने आपली पारंपरिक पूजा व धार्मिक विधी निसंकोचपणे पार पाडावेत, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. तथापि, १९४९ च्या कायद्यामुळे मंदिर व्यवस्थापनावर इतर समाज घटकांचा प्रभाव राहिला आहे, ज्यामुळे बौद्ध धर्मीयांची धार्मिक स्वायत्तता बाधित होत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
भीमसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
या लक्षणीय उपोषणाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि बौद्ध समाजाच्या न्याय्य मागण्यांना समर्थन देण्यासाठी सर्व अनुयायांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष संजय नाना शितोळे यांनी केले आहे.
२५ मार्च २०२५ रोजी तुळजापूर तहसील कार्यालयासमोर होणाऱ्या या उपोषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या