प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : जिल्ह्यातील विविध भागांत मुसळधार व संततधार पाऊस होत असून काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभाग, जिल्हा परिषद धाराशिव यांनी २३ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. या निर्णयाची माहिती गटशिक्षणाधिकारी तसेच पंचायत समित्यांमार्फत सर्व शाळांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे.
सदर सुट्टीचा निर्णय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला असून यामागील उद्देश नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही अपघात अथवा जीवितहानी टाळणे हा आहे.जिल्हा प्रशासनाने समाज माध्यमांद्वारे पालक व नागरिकांनी ही सूचना गांभीर्याने घ्यावी व विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये,असे आवाहन केले आहे.
या पत्रावर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंखे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नागेश मापारी यांच्या स्वाक्षऱ्या असून आजच सर्व शाळांमध्ये ही माहिती पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


0 टिप्पण्या