Ticker

6/recent/ticker-posts

गिरवली येथे विधवा सन्मान आणि प्लास्टिकमुक्तीचा अभिनव उपक्रम: वटपौर्णिमेनिमित्त समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा निर्धार

 

प्रतिनिधी : मिलिंद भांगरे

पुणे : वटपौर्णिमेच्या पावन पर्वावर गिरवली ग्रामपंचायतीने समाजाच्या मानसिकतेत परिवर्तन घडवणारा आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा अभिनव उपक्रम राबवला. गावातील विधवा महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने 'विधवा सन्मान कायदा' प्रत्यक्ष अंमलबजावणीस आणण्याचा ठराव प्रथमच कृतीत उतरवण्यात आला. तसेच प्लास्टिकमुक्त गाव करण्यासाठी महिलांनी कापडी पिशव्या स्वीकारत संकल्प केला.


यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ, आंबेगाव यांच्या पुढाकारातून गिरवली येथे वटपौर्णिमेच्या निमित्ताने ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच मंगल अरुण हगवणे यांच्या उपस्थितीत सामाजिक बदल घडवणारा कार्यक्रम पार पडला. पारंपरिक पद्धतीने केवळ विवाहित महिलांनीच वडाच्या झाडाभोवती फेर धरून पूजा करायची अशी परंपरा असताना, यावर्षी गावातील विधवा महिलांनीही या पूजेमध्ये सहभागी होत समाजाच्या जुनाट प्रथेला प्रत्यक्ष कृतीतून मूठमाती दिली.


विधवा महिलांनाही इतर महिलांप्रमाणे सण साजरा करण्याचा हक्क आहे, ही भावना या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आली. समाजाने घालून दिलेली विधवांसाठीची मर्यादा व त्यांच्याविषयी असलेली दूषित मानसिकता दूर करण्यासाठी त्यांच्या हस्ते वड पूजन घडवून आणण्यात आले. या कृतीतून ‘विधवा म्हणून कोणीही कमी नाही’ हा संदेश ग्रामीण पातळीवर पोचवण्याचा प्रयत्न झाला.


या कार्यक्रमाच्या शेवटी यशवर्धिनी संस्थेच्या वतीने सर्व महिलांना कापडी पिशव्या भेट देण्यात आल्या. यावेळी महिलांनी प्लास्टिकच्या वापराला पूर्णतः नकार देत "प्लास्टिकमुक्त कुटुंब" करण्याचा शपथ घेतली. हा उपक्रम केवळ महिला सन्मानापुरता मर्यादित न राहता, पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे देखील प्रेरणादायी उदाहरण ठरले.


या स्तुत्य उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी यशवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा अलका डोंगरे, सचिव अलका घोडेकर, सविता मुंढे, शशिकला सैद, सुशीला आवटे, सीमा सैद, शारदा गभाले, कल्याणी शिंदे, लेखापाल कल्पना एरंडे, कार्यकर्ते सुहास वाघ, हरिभाऊ गेंगजे व इतर बचत गट महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाची प्रस्तावना रोहिणी गभाले यांनी केली तर सूत्रसंचालन अश्विनी गभाले यांनी केले. आभार प्रदर्शन सुरेखा गभाले यांनी केले.


यशवर्धिनी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार घोलप यांनी सांगितले की, "पतीच्या निधनानंतर महिलांना समाजात दुय्यम स्थान दिले जाते. त्या मात्र स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन मुलांच्या स्वप्नांना पूर्णत्व देतात. त्यांना सन्मान देणे ही केवळ गरज नाही तर आपली जबाबदारी आहे. तसेच पर्यावरणाचा विचार करत प्लास्टिकमुक्त कुटुंब घडवणे ही काळाची गरज आहे."


गिरवली गावाने सामाजिक समतेचा आणि पर्यावरणस्नेही उपक्रमाचा आदर्श घालून दिला असून, इतर गावांनी याचा आदर्श घ्यावा अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या