प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : येथील बहुप्रतिक्षित बस स्थानकाचे उद्घाटन नुकतेच महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडले. मात्र उद्घाटनानंतर अवघ्या काही दिवसांतच झालेल्या अवकाळी पावसाने या बस स्थानकाच्या कामाची गुणवत्ता आणि अपूर्णता उघडकीस आणली आहे. संपूर्ण परिसर खड्डेमय झाला असून, पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत.
ज्या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी सुविधा असायला हव्यात, त्या ठिकाणी पायवाट चालण्याचीही व्यवस्था नाही. प्रवाशांना पावसाच्या पाण्यातून वाट काढावी लागत असून, महिला, वृद्ध आणि विद्यार्थ्यांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, कोट्यवधी रुपयांचा खर्च करून हे बस स्थानक बांधण्यात आले असले तरी अद्याप पूर्ण झालेले नाही. नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत की, जर बस स्थानक अपूर्ण होते, तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्घाटन करण्याची इतकी घाई का केली? उद्घाटनाचा सोहळा संपल्यानंतर लगेचच समोर आलेले हे चित्र पाहता, हे बस स्थानक केवळ दाखवायचं म्हणून केलं गेलं का, असा संशय व्यक्त होत आहे.
नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून, त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे की, संबंधित ठेकेदारावर चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. इतक्या मोठ्या प्रमाणात निधी वापरून बांधलेले बस स्थानक जर प्रवाशांना सुविधा देऊ शकत नसेल, तर तो निधी नेमका कुठे गेला, याचाही शोध घेण्याची गरज आहे.
प्रवाशांना एक सुरक्षित, सुलभ आणि सुविधा युक्त बस स्थानक हवे आहे. त्यामुळे धाराशिव बस स्थानकातील खड्डे तात्काळ मुरुम टाकून बुजवण्यात यावेत, तसेच पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था केली जावी, अशी मागणी जनतेकडून होत आहे.
या सर्व प्रकारावर परिवहन विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे, आणि प्रवाशांच्या सुविधांसाठी आवश्यक त्या सुधारणा तात्काळ करण्यात याव्यात, अशी अपेक्षा आता नागरिक करत आहेत.
0 टिप्पण्या