प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर: तुळजापूर तालुक्यातील मौजे गंजेवाडी येथील पाजर तलावाच्या प्रकरणावर अखेर प्रशासन हलले असून, सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांच्या आंदोलनानंतर सुमारे चार ते पाच दिवसांनी संबंधित अधिकाऱ्यांनी मुदत मागितली होती.अधिकाऱ्याच्या वतीने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते.
या आंदोलनाच्या धसक्याने मृदा व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज गंजेवाडी येथे जाऊन पाजर तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रशासनाकडून याआधी आश्वासन देण्यात आले होते की काही दिवसांत योग्य पंचनामा करून अहवाल सादर केला जाईल, मात्र प्रत्यक्ष कृती होत नव्हती. त्यामुळेच सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आणि प्रशासनाला जागे केले.
या भागातील एका शेतकऱ्याचा पंचनामा मागील २५ वर्षांपासून प्रलंबित होता. या दीर्घ प्रलंबित प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे होते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या दबावामुळे अखेर प्रशासनाने जागृत होऊन तलावाची पाहणी केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
तलावाच्या पाहणीमुळे येत्या काळात पीडित शेतकऱ्याला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून आता अंतिम अहवाल तयार करून न्याय देण्याचे संकेत मिळत असून, जवळपास ३० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर शेतकऱ्याला योग्य तो न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
या घटनेवरून स्पष्ट होते की, ठोस आंदोलन आणि सामाजिक बांधिलकीची भावना असलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासन हलते आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न ऐरणीवर येतात.
0 टिप्पण्या