Ticker

6/recent/ticker-posts

लिंकींग करणाऱ्या खत कंपन्या व विक्रेत्यांवर होणार कडक कारवाई – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचा स्पष्ट इशारा

प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योग्य दरात आणि वेळेवर खते उपलब्ध व्हावीत यासाठी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली आज खत उत्पादक कंपन्या तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील खत विक्रेते प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसारच खते पुरवावीत आणि कोणत्याही प्रकारे इतर खतांच्या लिंकींगची सक्ती करण्यात येऊ नये.


जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना MRP पेक्षा जास्त दराने खते विकू नयेत. कंपन्यांनी सर्व प्रकारची खते वेळेत व सुरळीतपणे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारावी आणि कोणतीही कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. खत वितरणात पूर्ण पारदर्शकता राखणे आवश्यक असून, दर व उपलब्धता ही माहिती प्रत्येक कृषि सेवा केंद्राच्या दर्शनी भागात लावावी, असेही आदेश त्यांनी दिले.

खते व बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक कृषि सेवा केंद्रातूनच खरेदी करावी, पक्की पावती घ्यावी, ज्यात विक्रेत्याची स्वाक्षरी व खरेदीचा तपशील नमूद असावा. अनुदानित खत खरेदी केल्यानंतर विक्रेत्याकडून ई-पॉस मशीनवरील अधिकृत पावती घेणे बंधनकारक असून, खताच्या बॅगेवरील छापील किंमत व दिलेल्या पावतीतील किंमतीत तफावत नसावी.


बियाणे खरेदी करताना त्याचे टॅग, पिशवी, बियाण्याचा नमुना हंगाम संपेपर्यंत जतन करावा, पिशवी सिलबंद असल्याची खात्री करावी व मुदत तपासावी. नामांकित कंपन्यांची उत्पादने वापरण्याचा सल्ला देण्यात आला असून, कोणत्याही कंपनीचे विशिष्ट ग्रेडचे खत जबरदस्तीने घेण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

शेतकऱ्यांना खत उपलब्धतेची माहिती ‘कृषिक’ मोबाईल अ‍ॅपवर मिळू शकते. याचा वापर करून शेतकऱ्यांनी जवळच्या केंद्रांवरील अद्ययावत साठ्याची माहिती मिळवावी.


खत विक्रीत लिंकींग करणाऱ्या कंपन्या व विक्रेत्यांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ व खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.


शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष कार्यरत करण्यात आले असून, जिल्हास्तरावरील संपर्क क्रमांक ०२४७२-२३७९४ असा आहे. तसेच तालुक्यातील कृषि अधिकारी, पंचायत समिती कृषि अधिकारी व संबंधित क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडेही तक्रार नोंदवता येईल, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र माने यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या