Ticker

6/recent/ticker-posts

धाराशिवच्या पोलीस अधीक्षकपदी रितु खोकर यांची नियुक्ती – एमडी ड्रग्ज प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बदली की आणखी काही? कारण अस्पष्ट

 प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव :राज्य शासनाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा निर्णय घेतला असून, यामध्ये धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी रितु खोकर (भा.पो.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या यापूर्वी सांगली येथे अपर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होत्या.


या बदल्यांमुळे विद्यमान पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली असून, गृह विभागाच्या ए.डी.-10010/25/2025/पोल-1 या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. रितु खोकर या आता धाराशिव जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणार आहेत.


या बदल्यांकडे फक्त प्रशासकीय निर्णय म्हणून न पाहता, मागील काही महिन्यांतील जिल्ह्यातील घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवरही पाहिले जात आहे. विशेषतः एमडी ड्रग्ज प्रकरण, ज्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजवली होती, त्याचे पडसाद विधानसभेतही उमटले होते. समाजमाध्यमांवर विधासभेतील उत्तर आधीच व्हायरल झाले होते त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाची विश्वासार्हता आणि कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले होते.


संजय जाधव यांच्यावर कोणतीही थेट कारवाई किंवा आरोप नसतानाही त्यांची अचानक झालेली बदली अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे ही बदली नेमकी कार्यक्षमतेच्या मूल्यांकनावर आधारित आहे की, विशिष्ट दबावाच्या पार्श्वभूमीवर – असा प्रश्नही उपस्थित होतो आहे.


दरम्यान, रितु खोकर यांच्याकडून नव्या जबाबदारीत कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत कडक कारवाई आणि सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्यशैलीकडे जिल्ह्याचे राजकीय, सामाजिक आणि नागरिक वर्तुळ उत्सुकतेने पाहत आहेत.


राज्यात एकाच वेळी २० हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांमध्ये धाराशिवसाठी घेतलेला हा निर्णय भविष्यातील पोलीस धोरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या