प्रतिनिधी : सयाजी पाटील
औसा :आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात, बहुतांश शिक्षक आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात कसूर करताना दिसतात. अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळा फक्त औपचारिकतेपुरत्या चालवल्या जातात. वेळेवर शिक्षक न येणे, विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष, आणि शिक्षणापेक्षा पगारावर अधिक लक्ष – या कारणांमुळे अनेक पालक आपल्या मुलांना खासगी इंग्रजी शाळांकडे वळवत आहेत. अशा परिस्थितीत औसा तालुक्यातील एकंबी वाडी येथील जिल्हा परिषद शाळा एक प्रेरणादायी अपवाद ठरली आहे.
येथील आदर्श शिक्षक श्री. गुणवंत साळुंके सर यांनी आपल्या शाळेला केवळ कामाचे ठिकाण न समजता, ती आपली जबाबदारी आणि ध्येय मानले आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये सुद्धा त्यांनी दररोज तीन तासांची विशेष वर्गसत्रे चालवून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवले आहे. ही कृती केवळ त्यांचं शिक्षण क्षेत्रावरील निष्ठा दर्शवत नाही, तर इतर शिक्षकांसाठीही एक प्रेरणा ठरते.
या उपक्रमात एकंबी वाडीचे मा. सरपंच जिवनराव चव्हाण साहेब, शालेय व्यवस्थापन समिती आणि गावकरी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शाळा केवळ शैक्षणिक केंद्र न राहता, गावाच्या विकासाचा कणा ठरते आहे.
साळुंके सरांचे हे कार्य केवळ एकंबी वाडीपुरते मर्यादित राहिले नाही, तर औसा तालुक्यातील व इतर भागांतील पालकांमध्येही चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांच्या या प्रेरणादायी कार्यामुळे ‘जिल्हा परिषद शाळाही उत्कृष्ट शिक्षण देऊ शकते’ हा विश्वास पुन्हा निर्माण झाला आहे.
जर प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला गुणवंत साळुंके यांच्यासारखे शिक्षक लाभले, तर त्या शाळा ‘नंदनवन’ होण्यात शंका नाही.
0 टिप्पण्या