प्रतिनिधी : जुबेर शेख
अकोला: प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांनी काही वेळापूर्वी त्यांच्या फेसबुकवर एक सूचक पोस्ट टाकत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे की, "येणाऱ्या काळात दुसरा निर्णय घेण्यात येईल." या विधानानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
प्रमोद कुदळे यांनी प्रहार जनशक्ती पक्षासाठी मराठवाडा आणि विदर्भात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने या भागांमध्ये आपली पाळेमुळे घट्ट केली असून, अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी पक्षात आणले आहे. त्यामुळे त्यांचा पक्षातला प्रभाव लक्षणीय आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रमोद कुदळे हे सध्या पक्षश्रेष्ठीवर नाराज आहेत. त्यांच्या मते, पक्षात जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना सध्या योग्य तो मान मिळत नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी लवकरच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
या घडामोडींमुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. जर त्यांनी कुदळे यांची नाराजी दूर केली नाही, तर पक्षाला मराठवाडा व विदर्भात मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
प्रमोद कुदळे जर दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतात, तर त्यांच्या सोबत पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते देखील नवीन मार्ग निवडू शकतात. यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या संघटनात्मक बळाला मोठा धक्का बसू शकतो. विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही स्थिती पक्षासाठी धोकादायक ठरू शकते.
प्रमोद कुदळे यांच्या फेसबुकवरील सूचक विधानानंतर प्रहार जनशक्ती पक्षात घडणाऱ्या हालचालींवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यांच्या निर्णयानुसार पक्षाची आगामी दिशा आणि स्थानिक राजकारणाचे समीकरण निश्चितच बदलू शकते.
0 टिप्पण्या