प्रतिनिधी : सयाजी पाटील
औसा – खरीप हंगाम 2024-25 मध्ये विमा भरल्यानंतरही तब्बल 23,000 शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षण न मिळाल्यामुळे औसा तालुक्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. विमा कंपनीच्या हलगर्जी कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असून, या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्ष औसा तालुका यांच्यावतीने 10 जून 2025 रोजी औसा तहसील कार्यालयासमोर "शेतकरी आक्रोश आसुड मोर्चा" काढण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
प्रहार पक्षाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, खरीप हंगामात शेतकऱ्यांनी वेळेवर विमा भरून सुद्धा त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारी नोंदवल्या, परंतु त्याची दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी आहे.
विमा योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमधून संरक्षण देणे आहे, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळत नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. शासनाने आणि संबंधित विमा कंपन्यांनी या संदर्भात त्वरित पावले उचलावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे.
मोर्चाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात येणार असून, "जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र करण्यात येईल", असा इशारा देखील पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. औसा तालुक्यातील विविध गावांतील शेतकरी या मोर्चात सहभागी होणार असून, शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष पुढाकार घेत आहे.
हे आंदोलन शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडेल, मात्र प्रशासनाने वेळेवर दखल घेतली नाही तर पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
0 टिप्पण्या