प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव:धाराशिव आणि बार्शी तालुक्यात मागील दोन ते तीन महिन्यांपासून वाघाने धुमाकूळ घातला असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, यामधील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे—धाराशिव जिल्ह्यात वाघाचे नैसर्गिक अधिवास नसताना हा वाघ येथे आला तरी कसा?
वाघाचा प्रवास 450 किमी, पण कुणालाच दिसला नाही?
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, हा वाघ यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून आला आहे. मात्र, यवतमाळ ते धाराशिव हे अंतर सुमारे 450 किलोमीटर आहे. एवढे अंतर कापताना शेकडो गावे, मोठे महामार्ग, रेल्वे मार्ग, नद्या आणि जंगलांचे पट्टे लागतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा वाघ या प्रवासादरम्यान कोणालाही दिसला नाही. ना कुठे त्याच्या हालचालींची नोंद झाली, ना सीसीटीव्ही फुटेज, ना कुठल्या गावातील नागरिकांनी त्याला पाहिले. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे की हा वाघ चालत आला की कुणीतरी मुद्दाम आणून सोडला?
वाघाचे वय फक्त अडीच वर्षे – एवढे लांब प्रवास शक्य?
वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा वाघ फक्त दोन ते अडीच वर्षांचा आहे. या वयात वाघ स्वतंत्रपणे एवढ्या मोठ्या अंतराचा प्रवास करतो का, हा संशोधनाचा विषय आहे. वाघाची नैसर्गिक सवय पाहता, तो एवढ्या लांबच्या प्रवासात अनेक अडथळ्यांना सामोरा गेला असता. मग त्याने हा प्रवास कसा केला?
परत जाण्यास वाघाला अडथळा का?
जर हा वाघ यवतमाळ येथून निसर्गरित्या चालत आला असेल, तर तो परत आपल्या मूळ अधिवासाकडे का जात नाही? धाराशिव जिल्ह्यात मोठे जंगल नाही, तरी तो येथेच का थांबला? यामध्ये काहीतरी मोठे रहस्य असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
वनविभाग अपयशी? लाखो रुपये खर्च तरी वाघ अद्याप मोकाट
वाघ पकडण्यासाठी वनविभागाने मागील तीन महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. या मोहिमेसाठी लाखो रुपये खर्च झाले, मात्र अजूनही वाघ पकडला गेलेला नाही. एवढा खर्च करूनही वाघावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे.
नागरिकांचे प्रश्न अनुत्तरित
1. हा वाघ खरंच यवतमाळहुन चालत आला का? की कुणीतरी मुद्दाम आणून धाराशिवमध्ये सोडला?
2. हा वाघ लहान असल्याने एवढ्या लांबचा प्रवास शक्य आहे का?
3. तो प्रवास करत असताना शेकडो गावांना लागून गेला, पण कुठेही त्याचे ठसे, सीसीटीव्ही फुटेज किंवा स्थानिकांनी पाहिले नाही. हे कसे शक्य आहे?
4. तीन महिन्यांपासून लाखो रुपये खर्चूनही वनविभागाला यश का आले नाही?
5. वाघ परत आपल्या अधिवासात का जात नाही?
संपूर्ण घटनेत मोठे गूढ?
या घटनेत काहीतरी गडबड असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे. वाघ हा जंगलात राहणारा प्राणी असून तो सहज मानवी वस्तीच्या भागात फिरत नाही. त्यामुळे तो धाराशिवमध्ये कसा पोहोचला, याचा शोध घेण्याची गरज आहे. वनविभागाने यावर सविस्तर खुलासा करावा आणि वाघाच्या हालचालींबाबत नागरिकांना खरी माहिती द्यावी, अशी मागणी होत आहे.
हा वाघ नक्की चालत आला की आणून सोडला? हा प्रश्न अनुत्तरितच आहे!
0 टिप्पण्या