प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : धाराशिव आणि बार्शी तालुक्यात मागील दोन-तीन महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या वाघाचे अखेर येडशी आभारण्यात ट्रॅप कॅमेऱ्यात दर्शन झाले आहे. वाघाने आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी फस्त केले असून, संपूर्ण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभाग गेल्या काही महिन्यांपासून वाघाला पकडण्याचे प्रयत्न करत असला तरी, प्रत्येक वेळी तो वन विभागाला चकमा देण्यात यशस्वी ठरला आहे.
वनविभागाची अपयशी मोहीम – लाखोंचा खर्च, पण वाघ मोकाट!
वनविभागाने दोन वेळा वाघाला बेशुद्ध करण्यासाठी डॉट मारले, मात्र तरीही तो बेशुद्ध झाला नाही. त्यामुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. वाघ पकडण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांना यासाठी पुरेसा अनुभव आहे का, यावर नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी वनमंत्र्यांना गाढव भेट देऊन निषेध करण्याची तयारी दाखवली होती, मात्र वनविभाग व जिल्हाधिकाऱ्यांनी एक महिन्याची मुदत मागितली.
प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
वाघाने आतापर्यंत शेकडो पाळीव प्राण्यांवर हल्ला करून त्यांचा नाश केला आहे. जर वनविभागाने सुरुवातीपासून गांभीर्य घेतले असते, तर शेतकऱ्यांचे एवढे मोठे नुकसान झाले नसते, असा नागरिकांचा आरोप आहे. आताही वाघ 20 एप्रिलपर्यंत वन विभागाच्या ताब्यात येईल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
वनविभागाकडून लाखोंचा अपव्यय – हा पैसा कुणाच्या खिशात गेला?
वाघ पकडण्याच्या मोहिमेसाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे, पण अद्यापही वाघ मोकाट आहे. यामुळे हा पैसा नेमका कुठे गेला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून चौकशी करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिला आहे.
वाघ मानवी जीवनासाठी धोकादायक – वनविभागाला गुन्हेगारी जबाबदार धरले जाईल!
जर लवकरच वाघाला ताब्यात घेतले नाही आणि त्यामुळे मानवी जीवनाला धोका निर्माण झाला, तर वनविभागावर गुन्हा दाखल केला जाईल, असा थेट इशारा सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिला आहे. नागरिकांतूनही मागणी होत आहे की, बिबट्याला पकडताना जशी तत्परता दाखवली, तशीच गंभीरता वाघ पकडण्यासाठीही दाखवली पाहिजे.
वनविभागाने त्वरित ठोस कारवाई करावी!
आता नागरिक आणि शेतकऱ्यांचे एकच म्हणणे आहे – गुंतवलेले लाखो रुपये आणि खर्च झालेला वेळ वाया घालवू नका, लवकरात लवकर वाघाला पकडा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्या! प्रशासनाने दिरंगाई केली, तर याचा तीव्र विरोध करण्यात येईल आणि भविष्यात मोठे आंदोलन उभे राहू शकते.
0 टिप्पण्या