Ticker

6/recent/ticker-posts

वनविभागाची निष्क्रियता? – वाघ पकडण्यासाठी ठोस उपाययोजना अद्याप नाही?शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण



प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव:धाराशिव तालुक्यात मागील काही महिन्यांपासून वाघाचा वावर वाढला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बार्शी तालुक्यात धुमाकूळ घातल्यानंतर वाघाने पुन्हा एकदा धाराशिव तालुक्यातील येडशी आभारण्याचा परिसर गाठल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी येथे बसवलेल्या कॅमेऱ्यात वाघाचे दर्शन झाले होते.

वाघ की बिबट्या? – प्रशासनाकडून अजूनही स्पष्टता नाही

आज सकाळी पिंपरी गावातील एका गायीच्या वासरावर वाघाने किंवा बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. मात्र, हा हल्ला वाघानेच केला की बिबट्याने, यावर अजून प्रशासनाने अधिकृत दुजोरा दिलेला नाही. तरीही, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाघ शहराच्या दिशेने येण्याची भीती

सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "येडशी आभारण्यामध्ये वाघाला उपजीविकेसाठी मिळणारे पशुधन संपल्यानंतर तो शहराच्या दिशेने जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत, तर भविष्यात मानवी जीवितास धोका निर्माण होऊ शकतो."

वनविभाग अजूनही गप्प – नागरिक संतप्त

वनविभागाने अद्याप वाघाला जेरबंद करण्याची कोणतीही ठोस उपाययोजना जाहीर केलेली नाही. त्यामुळे धाराशिव व बार्शी तालुक्यातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. "वाघाला पकडण्यासाठी वनविभाग कोणती प्रक्रिया राबवत आहे, हे नागरिकांना अजूनही समजलेले नाही," असे अनेक ग्रामस्थांनी सांगितले.

नागरिकांचे प्रशासनाकडे मागणी

धाराशिव व बार्शी तालुक्यातील नागरिकांनी वनविभागाने त्वरित वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि त्याला पकडण्यासाठी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. भविष्यात मानवी हानी होण्याआधी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात, अशी नागरिकांची भावना आहे.

वनविभाग पुढील काही दिवसांत काय पावले उचलतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या