Ticker

6/recent/ticker-posts

धाराशिव व बार्शी तालुक्यातील वाघ अद्याप मोकाट – वन विभागाला मुदतवाढ,गाढव भेट आंदोलन एक महिना लांबणीवर


प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव : मागील दोन-तीन महिन्यांपासून धाराशिव आणि बार्शी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाने शेतकऱ्यांचे शेकडो पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे. वन विभागाने लाखो रुपये खर्च करूनही अद्याप वाघाला पकडण्यात अपयश आले आहे. परिणामी, जनतेमध्ये रोष वाढत असून, सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी वेळोवेळी वन विभागाच्या निष्क्रीयतेवर ताशेरे ओढले आहेत.

गाढव भेट आंदोलन स्थगित, पण इशारा कायम

मनोज जाधव यांनी यापूर्वी वाघ पकडण्यासाठी वन विभागाला एक महिन्याची अंतिम मुदत दिली होती. मात्र, 20 मार्चपर्यंतही वाघ हाती न लागल्याने त्यांनी जिल्हाधिकारी मार्फत वनमंत्र्यांना गाढव भेट आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल घेत, जिल्हाधिकारी व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाधव यांना लेखी आश्वासन देऊन आणखी एका महिन्याची मुदत मागितली. त्यामुळे 20 मार्चचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. तथापि, 20 एप्रिलनंतर कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलन पुन्हा करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

वाघ सापडेल का? की पुन्हा आंदोलन?

वन विभागाला आता आणखी 30 दिवसांची संधी मिळाली आहे. या कालावधीत वाघ पकडला गेला नाही, तर गाढव भेट आंदोलन अटळ असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या मुदतीनंतरही जर वाघ मोकाट राहिला, तर हा विषय केवळ धाराशिवपुरता सीमित राहणार नाही, तर राज्यभर गाजू शकतो.

लाखो रुपयांचा खर्च, पण वाघ बेपत्ता!

वाघ पकडण्यासाठी पुणे व चंद्रपूर येथून खास पथक मागवण्यात आले होते. मात्र, या पथकाने वाघ पकडण्याऐवजी येडशी अभयारण्याचा फेरफटका मारला की अधिकाऱ्यांसोबत मौजमजा केली, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. लाखो रुपये खर्च करूनही वाघ पकडता आला नाही, तर हे पैसे नक्की कुठे गेले? वन विभागाने वाघ पकडण्यासाठी योग्य प्रयत्न केले की फक्त दिखाव्याचे प्रयत्न केले, याचा तपास जनतेकडून केला जात आहे.

वन विभागाची लगबग वाढली, वाघ पकडला जाईल का?

मुदतवाढ मिळाल्यानंतर वन विभाग अधिक सक्रिय झाल्याचे दिसत आहे. अधिकारी, कर्मचारी आणि विशेष पथके पुन्हा प्रयत्नशील झाली आहेत. मात्र, मागील तीन महिन्यांपासून वाघाने वन विभागाला सातत्याने चकवा दिला आहे. त्यामुळे येत्या 30 दिवसांत हा वाघ पकडला जातो का, की पुन्हा एकदा वन विभागाची भूमिका संशयास्पद ठरणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

गाढव भेट टळेल की अनिवार्य ठरेल?

येणाऱ्या 30 दिवसांत वाघ पकडला गेला, तर वन विभाग गाढव भेट आंदोलनापासून वाचेल. अन्यथा, गाढव भेट निश्चित आहे! त्यामुळे प्रशासनाने आता कसून प्रयत्न करावे, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. पुढील एक महिना धाराशिवसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या