Ticker

6/recent/ticker-posts

धाराशिव व बार्शी तालुक्यात वाघाचा धुमाकूळ: २ महिन्यांची मुदतवाढ,प्रशासनाचा खर्चाचा लेखाजोखा?


प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव:धाराशिव व बार्शी तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी अजून दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही प्राथमिक माहिती विभागीय अधिकारी बी.ए. पोळ यांनी दिली आहे. प्रशासनाने आतापर्यंत वाघ पकडण्यासाठी तब्बल १५ लाख रुपये खर्च केले असून, हा खर्च इंधन, जेवण व इतर गरजांसाठी केल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, एवढा खर्च करूनही वाघाला पकडण्यात अपयश आल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

वाघ अद्यापही मोकाट – जनतेच्या मनात भीती कायम

वाघाचा वावर धाराशिव व बार्शी परिसरात सातत्याने सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीकाम करणारे शेतकरी, लहान मुले आणि गोरगरीब मजूर या वाघाच्या धोक्याने चिंतेत आहेत. वनविभाग व प्रशासनाने वाघाला पकडण्यासाठी पुणे आणि चंद्रपूर येथून तज्ज्ञांची टीम बोलावली असली तरी अजूनही कोणतेही ठोस यश हाती लागलेले नाही.

वाघ पकडण्यापेक्षा खर्चाला प्राधान्य?

आतापर्यंत झालेल्या १५ लाख रुपयांच्या खर्चावर नागरिक संतप्त आहेत. दोन महिने प्रयत्न करूनही यश मिळाले नाही, मग पुढील दोन महिन्यात काय वेगळे होणार? प्रशासनाचा हा निर्णय वाघ पकडण्यासाठी आहे की फक्त सरकारी निधी खर्च करण्यासाठी? असा प्रश्न लोकांमधून विचारला जात आहे.

वाघावर अजून किती खर्च होणार?

पुढील दोन महिन्यांसाठी सरकार किती निधी मंजूर करणार? वाघ पकडण्यासाठी अजून किती योजना आखल्या जाणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा वाघ पुढील काळात मानवी हल्ले करणार नाही ना? हे अद्याप स्पष्ट नाही. वनविभाग याबाबत काहीही सांगू शकत नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाची परिस्थिती आहे.

आता पुढे काय?

वन विभाग वाघ पकडण्यासाठी अजून प्रयत्न करणार असला तरी हा वाघ नेमका किती दिवस मोकाट फिरणार?, त्यासाठी अजून किती निधी खर्च होणार? आणि या संपूर्ण मोहिमेचा शेवट काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता वाघाची पुढील दिशा काय असणार हे वाघ आणि वनविभागालाच माहीत!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या