प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर:तुळजापूर शहरातील नागरिक आणि विविध पक्षीय नेत्यांच्या पाठिंब्याने यात्रा मैदानाच्या मागणीसाठी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर यशस्वी ठरले. नुतन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दोन ते चार दिवसांत योग्य तपास करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित केले.
यात्रा मैदानासाठी १९९८ पासून प्रलंबित मागणी
सन १९९८ मध्ये तुळजापूर नगर परिषदेकडून गट क्रमांक १३८ आणि १३९ हा भूभाग यात्रा मैदानासाठी आरक्षित करण्यात आला होता. मात्र, आजपर्यंत त्या जागेचा उपयोग यात्रेसाठी करण्यात आलेला नाही. याच मुद्द्यावर नागरिकांनी आणि राजकीय नेत्यांनी एकत्र येत आंदोलन सुरू केले होते.
राजकीय व सामाजिक नेत्यांचा पाठिंबा
या आंदोलनाला तुळजापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी नगरसेवक सौ. आरती रणजित इंगळे, सौ. सुचिता आनंद (मालक) जगताप, भाऊ भांजी आदींनी पाठिंबा दिला. तसेच काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील आणि श्री तुळजाभवानी पुजारी मंडळानेही उपोषणास आपला पाठिंबा दर्शवला.
महिला उपोषणकर्त्यांचा मोठा सहभाग
उपोषणस्थळी शहरातील असंख्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रशासनाने लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर नायब तहसीलदार पेरे मॅडम, मंडळ अधिकारी अमर गांधले आणि बालाजी चामे यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू सरबत देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली.
पुजारी बांधवांची उपस्थिती
सदरील आंदोलनस्थळी माजी नगरसेवक अंबरीष (भैया) जाधव, माजी नगरसेवक अभिजीत कदम, शिवसेना नेते अमोल जाधव, किरण यादव, पुजारी नानासाहेब डोंगरे, काकासाहेब चिवचिवे, गणेश कदम, राजेश्वर कदम, विक्रम कदम आदी पुजारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांतच योग्य निर्णय घेतला जाईल, असे सांगितल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. नागरिक आता प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत.
नागरिकांच्या भावनांचा सन्मान आवश्यक
तुळजापूर शहरातील यात्रा मैदानाच्या मागणीला प्रशासनाने गंभीरतेने घेतल्यास नागरिकांचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले स्वप्न साकार होईल. आता सर्वांचे लक्ष जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील निर्णयावर केंद्रित झाले आहे.
0 टिप्पण्या