Ticker

6/recent/ticker-posts

बुद्धगया मुक्ती आंदोलन 2025: बौद्ध समाजाच्या मागण्यांसाठी निवेदन सादर


प्रतिनिधी : मिलिंद भांगरे

घोडेगाव, आंबेगाव (जि. पुणे) | समस्त बौद्धजन समाज आंबेगाव तालुका, सम्यक क्रांती प्रतिष्ठान (रजि.) आंबेगाव तालुका आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने बुद्धगया मुक्ती आंदोलन 2025 अंतर्गत एक महत्त्वाचे निवेदन मा. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय घोडेगाव यांच्या मार्फत महामहिम राज्यपाल, बिहार राज्य, महामहिम राज्यपाल, महाराष्ट्र राज्य आणि मुख्यमंत्री, बिहार राज्य यांना पाठवण्यात आले.

मुख्य मागण्या:

१. महाबोधी विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा
बौद्ध धर्मीयांचे सर्वोच्च धम्मस्थळ असलेले महाबोधी विहार, बुद्धगया हे इतर कर्मकांडांपासून मुक्त करून बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे. येथे बौद्ध धम्मानुसारच धार्मिक विधी पार पाडण्यात याव्यात.

2. द बुद्धगया टेम्पल अॅक्ट 1949 रद्द करावा
बुद्धगया महाबोधी विहाराच्या व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेला बुद्धगया टेम्पल अॅक्ट 1949 हा बौद्ध समाजाच्या हक्कांचे उल्लंघन करणारा असून, तो तात्काळ रद्द करण्यात यावा.


3. बौद्ध भिक्षु आणि कार्यकर्त्यांवरील अन्यायकारक कारवाया थांबवाव्यात
महाबोधी विहार मुक्तीसाठी आंदोलन करणाऱ्या बौद्ध भिक्षूं (धर्मगुरू) आणि कार्यकर्त्यांवर बिहार राज्य सरकार आणि प्रशासनाकडून अन्यायकारक कारवाई केली जात आहे. त्यांच्यावर लाठीचार्ज केला जात असून, विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व कारवाया तात्काळ थांबवून त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत.

आंदोलनाची पुढील दिशा:

बुद्धगया मुक्ती आंदोलन हे संपूर्ण देशभरातील बौद्ध बांधवांसाठी महत्त्वाचे असून, या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

बुद्धगया हे जागतिक बौद्धधम्माचे पवित्र स्थळ असून, ते पूर्णतः बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात असले पाहिजे, अशी ठाम भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. यासंबंधी महाराष्ट्र व बिहार शासनाने योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी गणेश कसबे तालुकाध्यक्ष त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सोनू अभंग,संघटक विजय थोरात,सामाजिक कार्यकर्ते मधुकर खरात,पोपट खरात,फकीरा देठे,सुनील अंकुश,लहू लवांडे,मनोज जेकटे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या