प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव: धाराशिव,तुळजापूर व बार्शी तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाला केवळ 72 तास शिल्लक राहिले आहेत. शासनाने दिलेल्या 28 फेब्रुवारीच्या मुदतीत वाघ पकडण्यात आले नाही, तर पुढील कार्यवाहीसाठी नवीन मंजुरी घ्यावी लागणार आहे. मात्र, अद्यापही वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या मुदतीबाबत कोणतेही स्पष्ट आश्वासन मिळालेले नाही.
मागील दोन महिन्यांचा लपंडाव
मागील दोन महिन्यांपासून वन विभागाने दोन वेळा प्रयत्न करूनही वाघाला पकडण्यात अपयश आले आहे. या कालावधीत वाघाने 40 हून अधिक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला असून, त्यामुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तज्ञांच्या मते, जर या भागातील पाळीव प्राण्यांचा वावर संपला, तर वाघ मानवी वस्तीकडे आकर्षित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तो ‘मॅन-ईटर’ होण्याआधी त्याला पकडणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
समाजसेवकांचा सरकार व प्रशासनावर दबाव
वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी समाजसेवक मनोज जाधव यांनी विविध आंदोलने केली आहेत. मात्र, त्यानंतरही प्रशासन आणि वन विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
"वन विभागाने येत्या 72 तासांत शर्थीचे प्रयत्न करून वाघ पकडावा, अन्यथा वन अधिकाऱ्यांच्या बेशरम वृत्तीचा निषेध करण्यासाठी त्यांना बेशरमाचे झाड भेट देण्यात येईल," असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यानंतरही जर वाघ पकडण्यात आला नाही, तर वनमंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत ‘गाढव भेट’ देऊन, अपयशी अधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
वाघाच्या हालचालींचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू
रामलिंग,तुळजापूर आणि बार्शी परिसरात हा वाघ सक्रिय असून, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाचे पथक प्रयत्न करत आहे. मात्र, वाघाला सुरक्षितरित्या पकडून जंगलात स्थलांतरित करणे ही एक मोठी कसरत असल्याने वन विभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
28 फेब्रुवारीनंतर काय?
28 फेब्रुवारीपर्यंत वाघाला पकडण्यात वन विभागाला यश मिळाले नाही, तर पुढील कारवाईसाठी शासनाची नवीन परवानगी घ्यावी लागेल. त्यामुळे याच 72 तासांत वन विभाग वाघाला जेरबंद करू शकतो का, की प्रशासनाला आणखी वेळ मागावी लागेल, यावर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या