प्रतिनिधी : राम थोरात
काक्रंबा – मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, अनेक पिकांचे गंभीर नुकसान झाले आहे. तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा परिसरात अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी व टोमॅटो पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज काक्रंबा गावात भेट देऊन प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी शेतकरी महादेव पाटील (गट क्र. ३८८) यांच्या सुमारे ४० आर क्षेत्रातील ज्वारी पीक व चन्नाप्पा वट्टे (गट क्र. ८१९) यांच्या २० आर क्षेत्रातील टोमॅटो पिकाच्या नुकसानीची माहिती घेतली.
पाहणीदरम्यान तुळजापूरचे तहसीलदार श्री. अरविंद बोळंगे, तलाठी पाटील मॅडम, कृषी सहाय्यक श्री. कापसे हे उपस्थित होते. खासदार निंबाळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आणि शेतकऱ्यांना शक्य तितका लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
या पाहणीवेळी चेतन बंडगर, दिपक भिसे, कार्तिक वाघमारे, तसेच स्थानिक पत्रकार, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून त्यांनी शासनाकडे मदतीसाठी पाठपुरावा करण्याचे वचन दिले.
अवकाळी पावसामुळे झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी हताश झाले असले तरी, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनामुळे त्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
0 टिप्पण्या