प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव:मागील दोन ते अडीच महिन्यांपासून धाराशिव व बार्शी परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरू असून, वन विभागाला तो पकडण्यात अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वन विभागाच्या निष्क्रीयतेचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध आंदोलनं केली आहेत.
सामाजिक कार्यकर्त्यांचे संघर्षशील आंदोलन
वन विभागाच्या निष्क्रीयतेकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी 14 फेब्रुवारी रोजी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन, एक महिन्याच्या आत वाघ पकडला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मात्र, वाघ अद्यापही मोकाट असल्याने आंदोलनाच्या रूपरेषेत सातत्याने नवे उपक्रम जोडले जात आहेत.
21 फेब्रुवारी : वन विभागाला "कागदी वाघ" भेट देऊन निषेध
28 फेब्रुवारी : विभागीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीला "बेशरमाचे झाड" भेट देऊन निषेध
20 मार्च : आता वनमंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत "गाढव भेट" देण्याचा इशारा
गाढव भेट देण्यासाठी परवानगीची मागणी
20 मार्च रोजी होणाऱ्या या अनोख्या आंदोलनासाठी सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय-धाराशिव,जिल्हाधिकारी धाराशिव व विभागीय वनाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या कडे गाढव भेट देण्यास परवानगी मागितली आहे. प्रशासनाने परवानगी दिली तर हे आंदोलन अधिक गाजण्याची शक्यता आहे.
वन विभाग अजूनही अपयशी?
या आंदोलनापूर्वी वन विभाग वाघ पकडण्यात यशस्वी ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंतच्या हालचाली पाहता, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसत नाही. विभागीय अधिकाऱ्यांनीही आंदोलनावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे हा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
धाराशिवकरांचे लक्ष आंदोलनाकडे
वन विभागाने तातडीने कारवाई न केल्यास हे आंदोलन आणखी तीव्र होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. 20 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांना परवानगी देतात का आणि वनमंत्री यांना गाढव भेट देण्याचा निर्णय काय होतो, याकडे संपूर्ण धाराशिवचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या