Ticker

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्यात पर्यटन, शेती आणि पाणी व्यवस्थापनास प्राधान्य – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार


प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव : जिल्ह्यात पर्यटन, शेती आणि पाणी व्यवस्थापनाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देऊन जिल्हा प्रशासन प्रभावी योजना राबवणार आहे. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना एकत्र आणून नियोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ५ मार्च रोजी विविध यंत्रणांच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. या वेळी प्रायमूव्ह पुणे संस्थेचे अजित फडणीस, जितेंद्र नाईक, सचिन रुपेकर, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरसिंग भंडे आणि शेषराव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

पर्यटन विकासासाठी ‘टूरिस्ट सर्किट’ प्रस्तावित

धाराशिव जिल्ह्यातील सातवाहनकालीन मंदिरे, ऐतिहासिक गड-किल्ले तसेच तुळजापूरसारखी महत्त्वाची तीर्थस्थळे एकत्रित करून ‘टूरिस्ट सर्किट’ तयार करण्याचा प्रस्ताव असून, यामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळेल, असे जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले.

"पर्यटकांना अधिकाधिक स्थळांना भेट देता यावी, यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. यामुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल आणि महिला बचत गटांसाठी रोजगार संधी निर्माण होतील," असे त्यांनी स्पष्ट केले.

शेतीसाठी नवीन योजना आणि मूल्यसाखळी निर्मितीवर भर

शेतकरी उत्पादक संस्थांनी (FPO) मूल्यसाखळी विकसित करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना भाजीपाला उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.

त्याचबरोबर, महामार्गालगत भाजीपाला आणि कृषी उत्पादन विक्रीसाठी नियोजन करण्यात येईल, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळेल.

जलसंधारणावर विशेष भर देत शेतकऱ्यांना अधिक उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

५० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

या वर्षी जिल्ह्यात ५० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व नागरिकांचा सहभाग असणार आहे.

"वृक्ष लागवडीसाठी योग्य जागांची निवड, रोपवाटिकांचे नियोजन आणि वृक्ष संगोपनाची जबाबदारी निश्चित करणे महत्त्वाचे आहे," असे श्री. पुजार यांनी सांगितले.


संपूर्ण विकासासाठी एकत्रित प्रयत्न

"पर्यटन, शेती आणि पाणी व्यवस्थापन या तीन क्षेत्रांमध्ये प्रभावी सुधारणा करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्व संबंधित यंत्रणांना एकत्र आणून कार्य करणार आहे. यामुळे स्थानिक नागरिकांचे उत्पन्न वाढेल आणि जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल," असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

सभेला उपस्थित मान्यवर

या सहविचार सभेला जिल्हा जलसंधारण अधिकारी सी.आर. राऊळ, सामाजिक वनीकरणचे वनाधिकारी व्ही.के. करे, विभागीय वन अधिकारी सी.ए. पोळ, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता बी.व्ही. कट्टे, जलसंधारण अधिकारी व्ही.बी. पाटील, लघु पाटबंधारे विभागाच्या मोनाली तोटावाड, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी सी.जी. जाधव, लघु पाटबंधारेचे उपविभागीय अभियंता व्ही.आर. पाटील, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक एन.के. व्हटकर आणि जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.जे. केत यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलली जात असून, पर्यटन, शेती आणि जलसंधारण या क्षेत्रांत लवकरच सकारात्मक बदल दिसून येतील, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या