प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव – वन विभागाच्या पथकाने एका भटक्या वाघाला पकडण्यासाठी गुंगीकरणाचे इंजेक्शन दिले, मात्र वाघ बेशुद्ध न झाल्याने अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. ही घटना येडशी परिसरात घडली असून, वाघाला पकडण्यासाठी पुन्हा नवा डाव टाकण्यात येणार आहे असे सांगण्यात आले आहे.
घटना कशी घडली?
गेल्या काही दिवसांपासून धाराशिव व बार्शी परिसरात एक वाघ फिरत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी दोन महिन्यापुर्वी वन विभागाकडे केल्या होत्या. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने वन विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या. विशेष पथकाला पाचारण करून वाघाला पकडण्याचे नियोजन करण्यात आले.
रविवारी रात्री वाघ जंगलाच्या सिमेवर आढळून आला. पथकाने त्याच्यावर गुंगीचे इंजेक्शन डार्टच्या माध्यमातून सोडले. मात्र, ठरलेल्या वेळेत वाघ बेशुद्ध न झाल्याने अधिकाऱ्यांचे टेंशन वाढले.
वाघ बेशुद्ध का झाला नाही?
तज्ज्ञांच्या मते, याला काही कारणे असू शकतात:
1. डोस कमी पडला असण्याची शक्यता – वाघाच्या वजनानुसार इंजेक्शनचा डोस ठरवला जातो. चुकीचा अंदाज घेतल्यास डोस कमी पडू शकतो.
2. वाघाची सहनशक्ती जास्त असू शकते – काही वेळा मोठ्या आणि सशक्त वाघांना औषध लवकर लागू होत नाही.
3. इंजेक्शन योग्य ठिकाणी लागू न पडणे – इंजेक्शन शरीराच्या मांसल भागात गेले नसल्यास त्याचा प्रभाव उशिरा दिसतो.
वन विभागाची पुढील रणनीती
वाघाला पुन्हा ट्रॅक करून योग्य प्रमाणात गुंगीचे औषध देण्यासाठी पथक जंगलात गस्त घालत आहे. स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “वाघाला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. त्याला सुरक्षितपणे पकडून योग्य ठिकाणी हलवले जाईल.”
या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून, नागरिक वन विभागाच्या पुढील कारवाईकडे लक्ष ठेवून आहेत.
0 टिप्पण्या