प्रतिनिधी : जुबेर शेख
अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू हे मागील पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलनावर बसले आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा तसेच इतर १४ मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु असून, या आंदोलनाला राज्यभरातून विविध संघटनांचा व राजकीय नेत्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
गुरुवारी (१२ जून) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी स्वतः आंदोलन स्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम देत शनिवारी (१४ जून) राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र आज ( दि.१२ ) रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत २४१ हून अधिक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाने अत्यंत संवेदनशील निर्णय घेत चक्काजाम आंदोलन स्थगित केले आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जंजवाळयांनी सर्व संघटनांना आवाहन करत सांगितले की, आता हे चक्काजाम आंदोलन शनिवारी न होता रविवारी १५ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येईल.
प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जंजवाळ यांनी सुद्धा जाहीर आवाहन करत सांगितले की, "रविवारी चक्काजाम आंदोलनाच्या दिवशी एकही वाहन रस्त्यावर दिसता कामा नये. हे आंदोलन सरकारच्या ढिसाळ धोरणांविरोधातील तीव्र संताप व्यक्त करणारे असेल."
राज्यातील अनेक ठिकाणी या आंदोलनासाठी नियोजन सुरू झाले असून, प्रशासनाला याची पूर्वसूचना देण्यात आली आहे. आंदोलन शांततेत पार पाडले जाणार असले तरी त्याची तीव्रता आणि व्याप मोठा असणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.
राज्य शासनाकडून अजूनही बच्चूभाऊ कडू यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले गेलेले नाही, त्यामुळे या आंदोलनाची दिशा व व्याप्ती अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता सर्वांचे लक्ष रविवारी होणाऱ्या या चक्काजाम आंदोलनाकडे लागले आहे.
0 टिप्पण्या