प्रतिनिध: जुबेर शेख
अमरावती : शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. अखेर सरकारकडून या आंदोलनाची दखल घेतली गेली असून, आज अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी आंदोलनस्थळी भेट देत बच्चुभाऊ कडू यांच्याशी चर्चा केली.
या बैठकीत मुख्यतः दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारने आश्वासने दिली आहेत.
प्रथम, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर येत्या दोन दिवसांत उच्चस्तरीय समिती गठीत करून तिचा अहवाल प्राप्त होताच तात्काळ निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
द्वितीय, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांचे मानधन वाढवण्याच्या मागणीवर सरकार सकारात्मक आहे. येणाऱ्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये निधीची तरतूद करून दिव्यांगांचे मानधन वाढवले जाईल, असे आश्वासन देखील देण्यात आले.
चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी खुद्द फोनवरून बच्चू कडूंशी संवाद साधत आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. मात्र, बच्चू कडूंनी तत्काळ आंदोलन थांबवण्यास नकार दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, आंदोलनाबाबतचा पुढील निर्णय कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून उद्या जाहीर करण्यात येईल.
बच्चुभाऊ कडू यांनी सर्व प्रहार कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना आवाहन केले आहे की, जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणीही हिंसक आंदोलन करू नये. संयम पाळावा आणि शांततेत सरकारच्या निर्णयाची वाट पाहावी, अशी विनंती त्यांनी केली.
आता बच्चुभाऊ कडू उद्या काय निर्णय घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे.
0 टिप्पण्या