प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव :प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू मागील सात दिवसांपासून अन्नत्याग आंदोलनावर ठाम असून, त्यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, दिव्यांगांना दरमहा ६ हजार रुपये मानधन, आणि इतर मागण्यांसाठी सरकारला आव्हान दिलं आहे. मात्र सात दिवस उलटूनही या आंदोलनावर कोणताही ठोस तोडगा निघालेला नसल्यामुळे राज्यभर प्रहारचे कार्यकर्ते आंदोलनात्मक पवित्रा घेत आक्रमक होताना दिसत आहेत.
सरकारच्या वतीने एका शिष्टमंडळाने बच्चुभाऊ कडू यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, चर्चेमधून कोणताही तोडगा निघाला नसल्याने बच्चुभाऊंचं आंदोलन सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरातून प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचा संताप उसळत असून, विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलने तीव्र होताना दिसत आहेत.
धाराशिवमध्ये देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी प्रहार धाराशिवच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाद्वारे प्रहार कार्यकर्ते आपल्या नेत्याला पाठिंबा दर्शवत सरकारला जागं करण्याचा प्रयत्न करणार असे धाराशिव प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी सांगितले आहे.
याच दरम्यान, प्रहार पक्षाने उद्या (१५ जून) संपूर्ण महाराष्ट्रात ‘चक्काजाम’ आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता आणि प्रशासनामध्ये खळबळ उडालेली असून, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन काय पावले उचलते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
राज्य सरकारने लवकरात लवकर या आंदोलनावर तोडगा काढून बच्चूभाऊ कडू यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आता जनतेतूनही होऊ लागली आहे. दरम्यान, बच्चुभाऊंची तब्येत सात दिवसांच्या अन्नत्यागानंतर कमकुवत झाली असूनही ते ठामपणे आंदोलनावर अडून राहिले आहेत.
राज्यातील शेतकरी, दिव्यांग आणि वंचित घटकांसाठी लढणाऱ्या या आंदोलनाचं पुढील काय रूप असेल आणि सरकार त्यावर काय भूमिका घेणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या