प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले अर्जुन आप्पा साळुंखे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तुळजापूर शहर संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीने तुळजापूर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, साळुंखे यांच्या समर्थकांनी जल्लोष करत त्यांचे अभिनंदन केले.
शहरभरात फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटप आणि गुलाल उधळून त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले. अर्जुन साळुंखे यांचा शहरात मजबूत जनसंपर्क आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांच्याभोवती तरुणांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग आहे. त्यामुळे ही नियुक्ती तुळजापूरच्या राजकीय समीकरणात एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.
माध्यमांशी बोलताना अर्जुन साळुंखे म्हणाले, "मी गेल्या अनेक वर्षांपासून कट्टर शिवसैनिक म्हणून पक्षासाठी निष्ठेने काम करत आहे. कुठेही अन्याय झाला, तर मी आवाज उठवतो. उद्धव साहेबांनी माझ्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. ती मी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. नागरिकांच्या सेवेसाठी मी झटणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचे अधिकाधिक नगरसेवक निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार आहे."
साळुंखे यांच्या सक्रियतेमुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नव्या रणनीतीने मैदानात उतरण्याची शक्यता आहे. शहरातील असंतुष्ट कार्यकर्ते आणि युवक वर्गाचे नेतृत्व साळुंखे यांच्या हाती एकवटल्यास, तुळजापूर नगरपरिषदेमध्ये सत्तांतरही होऊ शकते, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.
साळुंखे यांच्या नेतृत्वात पक्षात नव्या कार्यकर्त्यांचा ओघ वाढण्याची शक्यता असून, त्यांची कार्यपद्धती, सामाजिक सक्रियता आणि स्थानिक प्रश्नांवरील आक्रमक भूमिका हाच पक्षासाठी बळकटीकरणाचा आधार ठरणार आहे. त्यामुळे तुळजापूर शहरातील आगामी राजकीय घडामोडींमध्ये साळुंखे यांची भूमिका निर्णायक ठरण्याची चिन्हं आहेत.
0 टिप्पण्या