प्रतिनिधी : अशोक गरड
औसा : प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज औसा तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे पक्षाने अपंग, वंचित, शोषित आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा देणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मागण्यांना तत्काळ मान्यता देण्याची जोरदार मागणी केली आहे. अन्यथा “प्रहार स्टाईलने” तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बच्चूभाऊ कडू हे मागील पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाकडे राज्य शासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर उद्या औसा तहसील कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तालुकास्तरीय तीव्र आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाच्या दुर्लक्षाचा तीव्र निषेध नोंदविण्यात येणार आहे.
या निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते लक्ष्मण राऊत, सयाजी पाटील, रामेश्वर पाटोदकर, दत्ताभाऊ आनंदगावकर, रामभाऊ माडजे, परमेश्वर रसाळ, श्याम गोरे यांच्यासह असंख्य प्रहार सैनिकांच्या स्वाक्षऱ्या असून, सर्वांनी एकमुखाने आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या