Ticker

6/recent/ticker-posts

Voice of Devendra राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

प्रतिनिधी : जुबेर शेख 

मुंबई:"विकसित महाराष्ट्र" या विषयाला आधारून राज्यभरातील युवकांमध्ये वक्तृत्वातून कृती - कृतीतून नेतृत्व घडवण्याच्या दृष्टीने मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त "व्हॉइस ऑफ देवेंद्र" ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे लढवय्ये नेते, प्रभावी वक्ते आणि महाराष्ट्र विकासाच्या दिशेने ठामपणे वाटचाल करणारे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त स्वारंभ फॉउंडेशन, नाशिक प्रतिष्ठान व आय-फेलोज फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. “विकसित महाराष्ट्र” या विषयावर आधारित ही स्पर्धा युवकांना त्यांच्या शैलीत, विचारांतून आणि दृष्टीकोनातून महाराष्ट्राच्या भविष्याची मांडणी करण्याचे व्यासपीठ देणार आहे.


“Speak. Inspire. Lead!” या घोषवाक्याशी सुसंगत, ही स्पर्धा केवळ बोलण्याची नाही, तर विचारांची स्पष्टता, आत्मविश्वास आणि कृतीशील नेतृत्वाच्या शोधाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यातील युवकांपर्यंत पोहोचून त्यांना एक सकारात्मक राजकीय संवादासाठी प्रेरित करणे हा या उपक्रमाचा मूळ हेतू आहे.


या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी 2 ते 3 मिनिटांचे मराठी भाषण व्हिडिओ स्वरूपात www.voiceofdevendra.com या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे. तसेच, स्पर्धकांनी त्यांचे व्हिडिओ Instagram वर @voiceofdevendra या हँडलला टॅग करून पोस्ट करणे आवश्यक आहे. स्पर्धेतील सहभाग विनामूल्य असून नोंदणीसाठी अंतिम तारीख ५ ऑगस्ट २०२५ निश्चित करण्यात आली आहे. स्पर्धेचे मूल्यांकन प्रभावी भाषाशैली, आशयाची खोली, सकारात्मक दृष्टिकोन आणि नेतृत्वदृष्टी या निकषांवर आधारित असेल.


या उपक्रमामागे अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची छाया आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचे सौम्य, पण विचारप्रवृत्त करणारे भाषण; प्रमोद महाजन यांची नवमाध्यमांमधील कौशल्य आणि तेजस्वी संवादशैली; अमित शाह यांचे धोरणात्मक विचार स्पष्टपणे मांडण्याचे कौशल्य; आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट संवाद साधण्याची शैली या सर्वांनी राजकीय संवादाला एक नवे परिमाण दिले आहे. ही स्पर्धा त्या आदर्शांचं स्मरण करत तरुणांनी संवादाच्या माध्यमातून समाजात बदल घडवावा, हा उद्देश बाळगून राबवली जात आहे.


ही स्पर्धा Swarambh Foundation Nashik Pratishthan आणि ifellow foundation यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जात आहे. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या Sandip Foundation आणि Sapkal Knowledge Hub हे या उपक्रमाचे मुख्य सहप्रायोजक आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील युवकांना राजकीय, सामाजिक आणि वैचारिकदृष्ट्या सजग करण्यासाठी महत्त्वपूर्ण भागीदारी उभी केली आहे.


या स्पर्धेचे यशस्वी आयोजन प्रशांत टोपे, सागर शेलार, सुयोग भवारे, विनायक राजगुरू, प्रथमेश नाईक आणि सिद्धेश्वर खैरनार यांच्या संयोजनाखाली होत आहे. या तरुण नेतृत्वाच्या पुढाकारातून ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात प्रभावीपणे पोहोचवण्याचा ठाम निर्धार करण्यात आला आहे.


ही स्पर्धा केवळ एक कार्यक्रम नसून, महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची दिशा ठरवणाऱ्या तरुण विचारांची चळवळ आहे. विकासाची व्याख्या नव्या युगात नव्याने मांडण्याचा हा प्रयत्न आहे. ग्रामीण, शहरी, निमशहरी अशा सर्व भागांतील युवकांनी आपापल्या भाषाशैलीत, आत्मविश्वासाने आणि राष्ट्रीय भावनेने भरलेली मते या स्पर्धेद्वारे मांडावी अशी आयोजकांची अपेक्षा आहे.


आजच्या राजकारणात संवादाचा दर्जा उंचावणे, मुद्द्यांवर आधारित चर्चा घडवणे आणि नेतृत्वामध्ये मूल्यांचा ठाम आग्रह धरणे आवश्यक बनले आहे. Voice of Devendra ही स्पर्धा हाच दर्जा स्थापित करण्याचा एक प्रयत्न आहे.


तरी, या स्पर्धेचे राज्य समन्वयक “श्री. दयानंद सुनंदा मनोहर शिंदे” यांनी सर्व महाविद्यालयीन युवक-युवतींना आवाहन केले आहे की त्यांनी या स्पर्धेत सक्रिय सहभाग नोंदवावा आणि आपल्या विचारांनी विकसित महाराष्ट्राच्या दिशेने योगदान द्यावे.


www.voiceofdevendra.com संकेतस्थळावर जाऊन आजच नोंदणी करा !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या