प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : हवामान आधारित फळपिक विमा योजना सन 2025 साठी आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. मोसंबी, चिकू, डाळिंब, लिंबू, पेरू आणि सिताफळ या फळपिकांसाठी विमा हप्त्याची अंतिम तारीख आता ३० जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये डाळिंबासाठी अंतिम तारीख १४ जुलै असून सिताफळासाठी ती ३१ जुलै आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्रीटेक अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच ई-पिक पाहणीमध्ये नोंद असणेही आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी जर विमा योजना न घेण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्यांनी ७ दिवस आधी बँकेस लेखी निवेदन देणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांचा योजना सहभाग बंधनकारक समजला जाणार आहे.
विमा संरक्षण रक्कम व हप्ते खालीलप्रमाणे आहेत:
मोसंबी: ₹1,00,000 विमा संरक्षणासाठी ₹5,000 हप्ता
चिकू: ₹70,000 विमा संरक्षणासाठी ₹3,500 हप्ता
डाळिंब: ₹1,60,000 विमा संरक्षणासाठी ₹8,000 हप्ता
लिंबू: ₹80,000 विमा संरक्षणासाठी ₹4,000 हप्ता
पेरू/सिताफळ: ₹70,000 विमा संरक्षणासाठी ₹3,500 हप्ता
ही योजना कमी पाऊस, पावसाचा खंड, अति तापमान, आर्द्रतेतील तफावत या हवामानामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देते. विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार, ७/१२ उतारा, फळबागेचे नकाशा व फोटो, बँक पासबुक अशा आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे.
विमा योजना लागू असलेल्या महसूल मंडळांमध्ये धाराशिव, परंडा, उमरगा, तुळजापूर, कळंब, वाशी, भुम, लोहारा आदी तालुक्यांचा समावेश आहे.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी सर्व शेतकऱ्यांना वेळेत नोंदणी करून विम्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी www.pmfby.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
0 टिप्पण्या