Ticker

6/recent/ticker-posts

अन्नत्याग आंदोलनाचा पाचवा दिवस; राजू शेट्टींचा बच्चू कडूंना पाठिंबा, स्वाभिमानी संघटनेच्या वतिने शनिवारी चक्काजाम आंदोलनाची घोषणा

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

अमरावती:प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन आज पाचव्या दिवशीत प्रवेशले असताना, राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस प्रतिक्रिया मिळालेली नाही. या आंदोलनाला आता राज्यभरातील अनेक संघटनांचा पाठिंबा मिळत असून, आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन बच्चूभाऊंना पाठिंबा जाहीर केला.


या भेटीदरम्यान विविध मागण्या, शेतकऱ्यांच्या अडचणी, व सरकारच्या उदासीनतेवर चर्चा झाली. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारवर घणाघात करताना म्हटले की, “पाच दिवस झाले तरी सरकारने बच्चूभाऊंच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही, हे अत्यंत खेदजनक आहे.”


राजू शेट्टी यांनी सरकारला २४ तासांचा अल्टीमेटम देत सांगितले की, "जर पुढील २४ तासांत सरकारने आंदोलनाची गंभीर दखल घेतली नाही, तर येत्या शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन छेडले जाईल." या इशाऱ्यामुळे आता हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


दरम्यान, बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील विविध शेतकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय प्रतिनिधी पुढे सरसावत आहेत. आंदोलन दिवसेंदिवस बळकट होत असताना, सरकार मात्र अद्याप शांततेच्या भूमिकेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अद्याप सरकारच्या वतीने कोणतेही शिष्टमंडळ बच्चू कडू यांची भेट घेण्यासाठी गेलेले नाही, अशी माहिती मिळाली आहे.


या पार्श्वभूमीवर, शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चक्काजाम आंदोलनामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता सरकारची पुढील भूमिका काय असणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या