प्रतिनिधी : जुबेर शेख
अमरावती:प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मागील पाच दिवसांपासून शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह अन्य १४ मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. मात्र, पाच दिवस उलटल्यानंतरही सरकारकडून कोणतीही ठोस प्रतिक्रिया मिळाली नसल्याने आंदोलन अधिकच तीव्र होत चालले आहे.
बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून विविध राजकीय पक्ष, आमदार, खासदार आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. तरीदेखील अद्याप सरकारने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतलेली नाही, हे स्पष्ट दिसत आहे. त्यांच्या तब्येतीत दिवसेंदिवस होणाऱ्या घसरणीमुळे प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आता आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतला जात आहे.
कालपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको, निषेध मोर्चे, तहसील कार्यालयांवर आंदोलन, काळे झेंडे दाखवणे अशा विविध मार्गांनी शासनाचा निषेध नोंदवला आहे. अकोला येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी प्रहार कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध करत आंदोलनाची तीव्रता दाखवून दिली.
या आंदोलनाला आणखी धार देत मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, जर प्रशासनाने लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घेतली नाही, तर त्रिव (तीव्र) स्वरूपात संपूर्ण राज्यात शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि चक्काजाम आंदोलन करण्यात येईल.
दरम्यान, काही भागांमध्ये प्रहार कार्यकर्ते अधिक आक्रमक होत जाळपोळ आणि सरकारी मालमत्तेवर निषेध करताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कार्यकर्त्यांनी ठामपणे सांगितले की, सरकारने जर त्वरीत दखल नाही घेतली तर संपूर्ण महाराष्ट्रभर प्रहारतर्फे मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारले जाईल.
तर आज बच्चुभाऊ कडू यांना भेटण्यासाठी व पाठींबा देण्यासाठी शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी,स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे भोसले,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे येणार असल्याचे सांगितले जात आहे.
या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात राज्य सरकार या आंदोलनाची कशी दखल घेते, आणि बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन थांबवण्यासाठी कोणती पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेले हे आंदोलन आता जनतेच्या भावना आणि शासनाच्या भूमिकेच्या टप्प्यावर येऊन ठेपले आहे.
0 टिप्पण्या