Ticker

6/recent/ticker-posts

साठे नगर रोड व पावसाळी पाण्याच्या समस्येवरून संतप्त नागरिकांचे निवेदन – प्रशासनाकडे निवेदन सादर; योग्य उपाययोजनांची मागणी

 

प्रतिनिधी : सयाजी पाटील 

औसालातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मौजे बिरवली येथील साठे नगर वस्तीमध्ये गेल्या २० वर्षांपासून रस्त्याचे काम प्रलंबित असून, यामुळे स्थानिक नागरिकांना विशेषतः पावसाळ्यात अत्यंत हाल सहन करावे लागत आहेत. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी गट विकास अधिकारी, पंचायत समिती औसा यांना निवेदन सादर केले आहे.


साठे नगर वस्तीमध्ये सुमारे ३०० ते ४०० नागरिक वास्तव्यास असून, या भागात कोणताही डांबरी वा सिमेंट काँक्रीटचा रस्ता नाही. पावसाळ्यात रस्त्यावर साचणारे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरते, ज्यामुळे वृद्ध व्यक्ती, लहान मुले, शालेय विद्यार्थी यांचे हाल होतात. अनेक वेळा घरातील साहित्यही खराब होतो.


स्थानिक ग्रामपंचायत प्रतिनिधी फक्त निवडणुकीपुरते या भागात फिरकतात, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, काही शेजारचे शेतकरी मुद्दाम पावसाचे पाणी या वस्तीकडे वळवतात, जेणेकरून त्यांच्या शेतात पाणी साचू नये. मात्र त्यामुळे साठे नगरच्या रस्त्यावर दलदल निर्माण होते.


नागरिकांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, लवकरात लवकर साठे नगरचा रस्ता तयार करण्यात यावा आणि पावसाळी पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे.


निवेदनात इशारा देण्यात आला आहे की, जर प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर साठे नगरचे सर्व नागरिक व भीम अण्णा सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडतील.तसेच या निवेदनावर असंख्य नागरिकांच्या सह्या आहेत.


या निवेदनामुळे प्रशासनाची कसोटी लागणार असून, नागरिक आशेने अधिकाऱ्यांच्या निर्णयाची वाट पाहत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या