प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : धाराशिव व बार्शी तालुक्यात काही दिवसांपूर्वी धुमाकूळ घालणाऱ्या वन्यप्राण्याच्या हालचालींची चर्चा थांबण्याआधीच, आता तोच प्राणी तुळजापूर तालुक्यात दाखल झाल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. सुरुवातीला ही माहिती अफवाच वाटत होती, मात्र काही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष त्या वन्यप्राण्याचे दर्शन झाल्याचे सांगण्यात आले आहे.
आज दुपारी तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी परिसरात एका गाईवर झालेल्या हल्ल्यानंतर हा प्रकार अधिक गडद झाला. हल्ल्याच्या ठिकाणी वनविभाग व पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी केली. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की,गायीवर हल्ला करणारा प्राणी अंदाजे २०० ते ३०० किलो वजनाचा असून, त्याच्या पायांचे ठसे बघता तो वाघ असावा, असा त्यांचा संशय आहे.
दरम्यान, या घटनेनंतर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा या शक्यतेस दुजोरा दिला आहे. मात्र, तुळजापूर तालुक्यातील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, तो प्राणी वाघ आहे की बिबट्या, याबाबतची खात्री अद्याप झालेली नाही. ठसे आणि इतर पुरावे वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आले असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच स्पष्टता येईल.
तरीदेखील, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक प्रशासन व वनविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे व आपले पशुधन सुरक्षित स्थळी बांधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणताही धोकादायक निर्णय किंवा कृती न करता, शंका येताच तात्काळ वनविभागाला कळवावे, असेही सांगण्यात आले आहे.
सध्या या परिसरात वनविभागाची नजर ठेवण्यात आली असून, लवकरच योग्य कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे. वन्यप्राणी वाघ असल्यास, हे प्रकरण गंभीर असून त्यासाठी विशेष पथक मागविण्यात येणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
0 टिप्पण्या